जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भगीरथ कॉलनीत नातेवाईकाचे निधन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील ५ लाख २५ हजार रुपयांचे दागिणे चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर येथे सरला मदनलाल शेटीया वय ६९ ही वृध्द महिला वास्तव्यास आहेत. त्या २२ जुलै २०२२ रोजी त्याच्या जळगाव शहरातील भगीरथ कॉलनीत राहत असलेल्या नातेवाईकाचे निधन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी जळगावात आल्या होत्या. सरला शेटीया यांच्याकडे प्रवासात पर्स होती, या पर्समध्ये ५ लाख २५ हजारांचे दागिणे होते. सरला शेटीया भगीरथ कॉलनी येथे पोहचल्या, याठिकाणी त्यांनी त्यांची पर्स तपासली असता, पर्समध्ये ठेवलेले ५ लाख २५ हजारांचे दागिणे गायब असल्याचे दिसून आले. सर्वत्र शोध घेतला, मात्र दागिण्यांबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही, अज्ञात व्यक्तीने दागिणे चोरुन नेल्याची खात्री झाल्यावर तब्बल तीन महिन्यानंतर सरला शेटीया यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन बुधवारी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर पवार हे करीत आहेत.