शिवसेनेचे १४ खासदार आमच्या संपर्कात तर २५ आमदार नाराज ! : प्रसाद लाड

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज | शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावे आम्ही योग्य वेळेस जाहीर करू तसेच २५ आमदार देखील नाराज असल्याचा खळबळजनक दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.

शिवसेनेच्या खासदारांनी राज्य सरकार आणि राज्यातील आपल्या पक्षाच्या मंत्र्यांबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यातच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी   यांच्या कृपेमुळेच शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. यामुळे त्यांच्या १८ खासदारांपैकी १४ खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू  असे ते म्हणाले. शिवसेनेचे २५ आमदार नाराज असल्याचा दावाही भाजपचे आमदार प्रसाद लाड   यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रसंगी प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणाले की, तळमळतंय, जळमळतंय. मात्र, आता त्यांनाच आपल्या पक्षातील खासदारांची तळमळ, जळजळ दूर करता आली नाही. मात्र, त्याचं चूर्ण आमच्याकडे आहे आणि आम्ही ते योग्यवेळी देऊ, असं टोलाही लाड यांनी लगावला आहे.

 

 

 

Protected Content