४ कोटी रुपये किमतीच्या अवैध बियाण्यांचा साठा जप्त

 

यवतमाळ : वृत्तसंस्था ।  यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात बियाण्यांचा अधिकृत अवैध साठा जप्त करत संजय  मालानी (५४ , रा. बोरीअरब ) याच्यावर कारवाई करून गोदाम सील केले आहे.

 

दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील धरतीधन सीड प्रोसेसिंग प्लांटमध्ये शुक्रवारी सांयकाळी पुणे, यवतमाळ व दारव्हा येथील कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये अवैधरित्या बियाणे तयार केले जात असल्याचं उघडकीस आलं आहे.

 

खुल्या बाजारातून सोयाबीन, तूर, चणा आणायचा आणि मशीनमधून छाटणी करून बॅग भरायची आणि तयार झालेली ३० किलोची बॅग शेतकऱ्यांच्या माथी मारायची, असा प्रकार या गुन्हेगारांकडून केला जातो. कमी दरात बियाणे मिळत असल्याच्या आशेपोटी शेतकरी हे बियाणे खरेदी करत होते. मात्र, या बियाण्यांचा भंडाफोड झाला.

 

कृषी विभागाच्या पथकाला या संदर्भातील गुप्त माहिती मिळाली होती. कारवाईच्या दृष्टीने तीन पथके तयार करण्यात आली. एकाचवेळी धाड टाकून कारवाई केली. या बीज प्रक्रिया केंद्रावरून ८५० क्विंटल सोयाबीन व तूर बियाणे, ६६०.५ क्विंटल लूज सोयाबीन, एक हजार ७७९ क्विंटल लूज तूर, दोन हजार ७०० क्विंटल लूज चणा आणि ट्रकमधून २५० क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आले.

 

या सर्व मालाची किंमत ४ कोटी २० लाख रूपये असल्याचे तपास पथकाकडून सांगण्यात आले. दारव्हा पोलिस स्टेशनला पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव शिंदे (३९) यांच्या तक्रारीवरून आरोपी संजय मालाणी यांच्यावर भादंवि ४२०, ४६३, ४६५, ४६८, ४७१ कलमान्वये तसेच सहकलम ७ ए, ७ बी, ७ सी, ७ डी बीज अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

Protected Content