हिरेन यांच्या मृत्यूच्या निष्पक्ष चौकशीची चित्रा वाघ यांना आशा

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । मनसुख हिरेन यांचा मुंब्रातील रेतीबंदर परिसरात मृतदेह आढळून आला. हिरेन यांची चौकशी सुरू असतानाच ही घटना घडल्यानं आता शंका विरोधकांकडून उपस्थित केल्या जात आहेत. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करत सरकारकडे निष्पक्ष चौकशीची आशा व्यक्त केली आहे.

 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. स्फोटकं ठेवून गाडी घराबाहेर कुणी उभी केली, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणालाच नाट्यमय वळण मिळाले असून, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मागील घटनांचा संदर्भ देत सरकारला ठाकरे सवाल केला आहे.

 

 

 

“महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

 

 

“सचिन वाझे हे ठाणे पोलिसांचा भाग नाहीत. ते एटीएसचाही भाग नाहीत. हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या भोवती संशयाची सूई फिरत आहे. असं असताना ते ठाण्यात पोस्टमार्टमच्या ठिकाणी हजर का आहेत? वाझे यांच्या या उपस्थितीमुळे संशय अधिकच बळावत आहे. हिरेन मृत्यू प्रकरणात सरकारचा चौकशीचा फेरा आणि दिशा याबाबत संशय वाढत आहे. यात काही तरी काळंबेरं असल्याचं पुन्हा गडद होत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे दिली जावी,” अशी मागणी आशिष शेलार यांनी आधीच सरकारकडे केलेली आहे.

Protected Content