नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिवसेनेने लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा हाती घेतला असून लोकसंख्या नियंत्रणाबाबतचे एक खासगी विधेयक आणले आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी हे खासगी विधेयक आज राज्यसभेत मांडले आहे.
अनिल देसाई यांनी भारतीय राज्यघटनेतील कलम ’47 अ’मध्ये बदल करण्यासाठी सुधारित विधेयकाचा प्रस्ताव ठेवला आहे. भारतातील लोकसंख्या वाढीचा भस्मासूर पाहून दुरुस्तीचा प्रस्ताव मांडल्याचे अनिल देसाईंनी सांगितले. ज्यांना दोन अपत्ये आहेत अशांनाच नोकरी आणि शिक्षणात सवलत द्यावी अशी तरतूद या विधेकात करण्यात आली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास देशातील कुटुंब नियोजन पद्धतीला शिस्त लागेल, असे खासदार देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या विधेयकानुसार ज्या दांपत्यास दोनपेक्षा अधिक मुलं असतील, असा कुटुंबातील मुलांना शैक्षणिक सवलती मिळणार नाहीत. तसेच नोकरीची संधीही नाकारण्यात येईल.