हतनुरचे २४ दरवाजे उघडले; तेरा पैकी सात प्रकल्प फुल्ल; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या तापी नदीवरील हतनुर धरणात सुरु असलेल्या पावासामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे आज शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी हतनुर धरणाचे २४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. धरणातून ७१ हजार १२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने प्रशासनाने तापी नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परिसरात ३८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. हतनूर प्रकल्प पाण्याची पातळी २०९.९४० मिटर असून १९३.६० मि.मी. क्युबिक आहे.

तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील ७२ तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे पूर्ण उघडले असून १२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे पुढील ७२ तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

१३ पैकी सात प्रकल्प ओसांडले
जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. जिल्ह्यातील तेरापैकी सात मध्यम प्रकल्पांत १०० टक्के उपयुक्त साठा झाल्याने हे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, मन्याड या सात प्रकल्पांमध्ये १०० टक्के उपयुक्त साठा आहे. तर मोर ६६.३९ टक्के, बहुळा ७३.२८ टक्के, गुळ ७८.०७ टक्के, बोरी ८३.७४ टक्के, अंजनी ४३.१८ टक्के व भोकरबारी धरणात ७.१० टक्के उपयुक्त साठा आहे.

Protected Content