स्थलांतरीत कामगारांसाठी समुपदेशन व सुविधा केंद्राची स्थापना

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणू दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर ‘ब्रेक द चेन’ अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील स्थलांतरीत कामगारांकरीता कामगार आयुक्‍त्त कार्यालयात समुपदेशन व सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. यासाठी केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 4 एप्रिल, 2021 रोजी नविन मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. त्यानुसार कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी कामगार विभागाच्या कार्यालयामध्ये स्थलांतरीत कामगारांकरीता समुपदेशन व सुविधा केंद्र स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील विविध आस्थापना/ कारखाने  येथे काम करीत असलेले स्थलांतरीत/परप्रांतीय कामगार लॉकडाऊनमुळे त्यांच्या मुळगावी (मुळ राज्यात) जात असल्यास सदर कामगारांनी त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, आस्थापनेचे नाव व पत्ता इत्यादी माहिती कार्यालयाच्या [email protected] या ईमेल वर पाठविण्यात यावी. तसेच परराज्यात काम करीत असलेले जळगाव जिल्ह्यातील कामगार हे लॉकडाऊनमुळे जळगाव जिल्ह्यात मुळ गावी परत आलेले/येत असल्यास सदर कामगारांनी देखील त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, आस्थापनेचे नाव व पत्ता इत्यादी माहिती कार्यालयाच्या [email protected] या ईमेल वर पाठविण्यात यावी.

 

स्थलांतरीत कामगारांनी त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत मोफत टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधावा. तसेच स्थलांतरीत कामगारांना काही अडचणी/प्रश्न असल्यास या कार्यालयातील श्री. जितेंद्र पवार, केंद्र प्रमुख यांच्याशी कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0257- 2239716 वर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त चं. ना. बिरार यांनी कळविले आहे.

 

Protected Content