सामान्यांना कोरोनाची लस २०२२ नंतरच

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सर्वसामान्यांना कोरोना लवकर मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याचे संकेत दिले आहेत.

देशातील कोरोनाची भीती अद्यापही कमी झालेली नाही. दिल्लीत तिसरी लाट सुरू आहे. त्याचबरोबर सण उत्सवाच्या काळात आणखी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलं असून, सगळ्यांच्याच नजरा सध्या लशीकडे लागल्या आहेत.

एम्सच्या संचालक असण्याबरोबरच कोरोना व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सचे गुलेरिया हे सदस्य आहेत. डॉ. गुलेरिया म्हणाले, “सध्या तरी विषाणू संपणार नाही. भारतात लस येण्यासाठी अजून एक वर्ष तरी लागू शकते. भारतातील लोकसंख्या खूप जास्त आहे. ज्याप्रमाणे इतर आजारांवरील लशींप्रमाणेच कोरोनाची लस सहज उपलब्ध होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांपर्यंत लस पोहोचण्यासाठी एक वर्षांपेक्षा अधिक काळ लागणार आहे,” असं गुलेरिया म्हणाले.

लस आल्यानंतर देशासमोर कोणतं आव्हान असणार आहे? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर गुलेरिया म्हणाले,”लशींच्या वितरणाला आमची प्राथमिकता असेल, कारण देशातील सर्वच भागात लस पोहोचायला हवी. कोल्ड चेन सांभाळून पुरेशा प्रमाणात इंजेक्शनही देशातील सर्वच भागात पोहोचवणं आमच्यासमोर महत्त्वाचं आव्हान आहे,” असं गुलेरिया यांनी सांगितलं.

“पहिल्या टप्प्यातील लशींनंतर दुसऱ्या टप्प्यात येणारी लस अधिक प्रभावी असेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील लशीचं काय करायचं? त्यानंतर आम्हाला ठरवावं लागणार आहे की, कुणाला पहिल्या टप्प्यातील लस द्यायची आणि कुणाला दुसऱ्या टप्प्यातील लस द्यायची. खूप सारे निर्णय एकाच वेळी घेण्याची गरज असेल,” असं गुलेरिया म्हणाले.

Protected Content