मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा –विरोधी पक्षाला जीवानिशी संपवण्यासाठी सरकारची प्रवृत्ती जर असेल आणि पोलिसांसमक्ष झेड सुरक्षा असलेल्या तसेच पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जीवे मारण्यासाठी यंत्रणेचा वापर होत असेल तर अशा हिटलरी प्रवृत्तीशी संवादापेक्षा संघर्ष बरा अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा कार्यालयात पत्रपरिषदेत दिली.
आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण दिले होते. परंतु मुंबईसह महाराष्ट्रात चार-पाच दिवस दिवसातील घटना पाहता सरकारने संवादासाठी जागाच ठेवलेली नाही. विरोधी पक्षातील नेत्यांना पदाधिकाऱ्याना किंवा झेड सुरक्षा असलेल्या किरीटी सोमय्यांवर पोलिसांच्या समक्ष हल्ला झाला. मोहीत कंबोज यांच्यावर मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला.पोलीस संरक्षणात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जीवे मारण्यासाठी हल्ले होत असतील. त्यासंदर्भात एफआयआर नोंदवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत असेल, तर मग अशा परिस्थितीत सर्वपक्षीय बैठकीत जाऊन काय फायदा.
राज्यात सर्वत्र भाजपाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लक्ष करून केसेस नोंदवल्या जातात. कधी प्रवीण दरेकरांसह अन्य जणांवरील खोट्या केसेस संदर्भात उच्च न्यायालायाने दिलासा दिला तर उच्च न्यायालयाच्या निर्णयावरच आरोप केला जातो. इतक्या खालच्या स्तराला पोहचले आहेत. आठ खोट्या तक्रारी रणजीतसिंग नाईक-निंबाळकरांविरोधात केल्या, परंतु एकाही तक्रारीत तथ्य नाही. पोलिस यंत्रणेचा हा दुरुपयोगचकरीत खोट्या केसेस दाखल आहेत. एकही केस टिकली नाही आणि टिकूहि शकत नाही. असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवार मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
ज्या बैठकीला मुख्यमंत्रीच नाही, त्या गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन तरी काय फायदा ? मुंबईत हल्ली जे काही सुरू आहे ते सर्व मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर आहे. आम्हाला बोलावून त्या बैठकीत कोणता निर्णय घेणार आहेत? आणि गृहमंत्र्यांना निर्णय घेण्याचे काही अधिकार तरी आहेत का? मुख्यमंत्रीच उपस्थित नसलेली ही बैठक म्हणजे टाईमपास आहे का? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला. या सरकारने संवादासाठी जागा ठेवलीय असं आम्हाला वाटत नाही. जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल, तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. अशाप्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला असल्याचेही फडणवीसांनी यावेळी म्हटले आहे.