सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगलं बडवू : यशोमती ठाकूर

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रात सत्ता मिळाली असतानाही त्यांना राज्यांमध्ये फोडाफोडी करण्याची हाव आहे. आम्ही गांधीवादी आहोत पण दादागिरी किती दिवस सहन करायची. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. तुमची गाठ आमच्ययाशी आहे लक्षात ठेवा. पण जर कोणी सरकार अस्थिर करण्याचा किंवा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला चांगलं बडवू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

 

 

मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता राजस्थानमध्ये भाजपाने आपला घाणेरडा खेळ आणि घाणेरडं राजकारण सुरुच ठेवले आहे. शेणातला किडा ज्याप्रमाणे शेणातच राहतो तसे यांचे झाले आहे. मला सातत्याने महाराष्ट्रामध्ये काय असे विचारले जाते. माझे सर्वांना सांगणे आहे राज्यातले सरकार स्थिर आहे. महाराष्ट्राने देशाला नवे राजकीय समीकरण दिले असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले. भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप येईल असा गौप्यस्फोट देखील यशोमती ठाकूर यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री ज्यांना घेऊन फिरत आहेत ते बाहेरुन आलेले लोक आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा पक्ष किती दुर्बळ झाला आहे हे दिसत आहे. त्यांच्या १०५ पैकी आमचे किती लोक तिकडे गेले आहेत आणि ते कधीही परत येतील,असा दावा देखील यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

Protected Content