सत्ता आल्यावरही विरोधकांची एकी टिकणे महत्वाचे ; सोनिया गांधींच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचा सल्ला

 

 

मुंबई: वृत्तसंस्था । सत्ता आल्यावरही विरोधकांची एकी टिकणे महत्वाचे आहे असा सल्ला काल झालेल्या सोनिया गांधीं यांच्या समवेतच्या विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे  यांनी दिला असल्याची माहिती आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली

 

 

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काल विरोधी पक्षनेत्यांशी संवाद साधला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही दृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आता खुर्ची दिसत नाही, तरीही आपण एकत्र आहोत. जेव्हा खुर्ची दिसेल तेव्हाही आपण एकत्रं राहिलं पाहिजे, असं सोनिया गांधी यांना सांगितलं. शिवसेना नेते संजय राऊत यांनीच याचा गौप्यस्फोट केला आहे.

 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे. विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांची काल दिल्लीत बैठक झाली. सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित केली होती. अडीच तास ही बैठक चालली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार तसेच इतर राज्यातील नेते व मुख्यमंत्री सहभागी झाले होते. सर्वांनी एकजूटीने राहून काम केलं पाहिजे हा सर्वांचा मुद्दा होता. या बैठकीत लोकशाही, महागाईसह देशातील विविध प्रश्नांवरही चर्चा झाली, असं राऊत म्हणाले. 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. विरोधकांचं हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

यावेळी त्यांनी तालिबानवरही टीका केली. नक्कीच भारताला तालिबानचा मोठा धोका आहे. कारण तालिबानला पाकिस्तान आणि चीन देखील समर्थन करत आहे. या दोघांमुळे तालिबान वाढत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार अत्याचार होत आहेत. चीन आणि पाकिस्तान हे भारताचे भयंकर शत्रू आहेत हे सर्वांना माहीत आहे. अशा वेळेस आपल्या देशातून तालिबानच्या समर्थनार्थ एखादा आवाज उठत असेल तर तो सरकारने जागच्याजगी चिरडून टाकला पाहिजे. ही जबाबदारी पंतप्रधान आणि गृह खात्याची आहे, असं ते म्हणाले.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तालिबानबाबत विधान केलं होतं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोण काय बोलतो त्याच्यावरती आम्ही काही बोलत नाही. पण जेव्हा बाबरी पडण्याचा प्रकार झाला तेव्हा पण सर्व जण पळून गेले होते. आम्ही तेच लोक आहोत. 1992 साली मुंबई बॉम्ब ब्लास्ट झाला त्या दंगलीत देखील शिवसेनेना पुढे आली होती. तेव्हा हे कुठे गेले होते?, असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला.

 

कोणताही हल्ला या ठिकाणी झाला तर लढण्यासाठी आम्हीच असणार? शिवसेना सर्वांना माहीत आहे. प्रखर देखील आहे, हे मोदींना देखील माहीत आहे. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला त्याग आणि बलिदान केले आहे. अनेकांनी देखील बाबरीच्या वेळी देखील शिवसेनेवर बोट दाखवलं होतं. मुंबई जेव्हा दंगल झाली तेव्हा देखील पाकिस्तानचा हात होता. त्या वेळेस रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी दंगेखोरांचा सामना केला होता. तेव्हा देखील अनेक जण कडी कुलूप लावून आतमध्ये बसले होते आणि आज आम्हाला तालिबानी म्हणतात, असा हल्लाही त्यांनी चढवला. शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या हितासाठी झाली आहे आणि प्रत्येक वेळी मराठी माणसावर अन्याय होईल तेव्हा शिवसेना आजही त्यागासाठी बलिदानासाठी सदैव तत्पर असेल हे सगळ्यांना माहीत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

Protected Content