शेतात जमिनीवर तुटून पडलेल्या विद्युत तारेने घेतला शेतकऱ्याचा बळी

पाचोरा, प्रतिनिधी  | शेतात शेळी चारत असतांना पिकांमध्ये तुटून पडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून पाचोरा तालूक्यातील  कळमसरा  येथील शेतकऱ्याचा  दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची घटना शुक्रवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. विद्युत वितरण कंपनीच्या  गलथान कारभाराने शेतकऱ्याचा नाहक बळी घेतल्याचा आरोप करत परिसरात संतापाची लाट  उसळली आहे.

 

पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे अल्पभूधारक शेतकरी मधुकर नेटके वय अंदाजे ५५ वर्षे त्याच्या शेत शिवारात आपली शेळी चारण्यासाठी गेला असता शेळी चारत असतांना शेळी अचानक पळाल्याने शेळी मागे पळत असतांना याच परिसरात कापूस पिकात जमीनीवर तुटून पडलेल्या विद्युत तारा व त्यातील प्रवाहाने या शेतकऱ्याला जोरदार शॉक (करंट) लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. २४ रोजी सायंकाळी कळमसरा शिवारात घडल्याने महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नाहक एक गरिबाचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळत आहे.  विशेष म्हणजे कालच दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आमदार किशोर पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी विज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. बैठकीला काहीच तास होत नाही तोवर ही घटना घडली आहे.   याबाबत अधिक तपास केला असता कळमसरा शिवारात या परिसरात तारा तुटून पडले असल्याची वारंवार तक्रार करुन सुध्दा विद्युत वितरणचे कर्मचारी व अधिकारी यांनी लक्ष न देता उडवाउडवीची उत्तर देत कोणतीही कामे केली नसल्यामुळे यांच्या हरामखोरा वृत्तीमुळे व मनमानी पद्धतीने कामकाज सुरु असल्यामुळे या निष्पाप शेतकऱ्याचा हकनाक बळी गेल्याने कळमसरा गावपरिसरातील नागरिकांनी संतप्त भावाना व्यक्त करत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जोरदार मागणी होत आहे.

 

Protected Content