शेतकरी आंदोलन माओवाद्यांच्या हाती- गोयल यांचा आरोप

 

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शेतकरी आंदोलन हे कट्टरपंथी डाव्या विचारधारेला बळी पडले असून माओवाद्यांच्या हाती गेले असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अलीकडेच शेतकरी आंदोलनास पाक व चीनची मदत असल्याचा आरोप ेकला होता. यानंतर आता पियुष गोयल यांच्या सारख्या बड्या नेत्याने याच प्रकारचा गंभीर आरोप केला आहे. शेतकरी आंदोलन हे आता डावे आणि माओवाद्यांच्या हाती गेले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डाव्या विचारसरणीच्या संघटना आपला अजेंडा चालवू इच्छित आहेत. शेतकर्‍यांनी त्यांच्या प्रलोभांना बळी पडू नये आणि सरकारसोबत चर्चा करावी. शेतकर्‍यांसाठी सरकारचे दरवाजे प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी खुले असल्याचे गोयल म्हणाले.

गोयल पुढे म्हणाले की, डाव्या संघटना शेतकर्‍यांना भडकवत आहेत. या कायद्यांमुळे देशातील शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे. काही मोजक्या लोकांसाठी संपूर्ण देशातील शेतकर्‍यांचे नुकसान करता येणार नाही.
शेतकरी कायद्याच्या कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करू इच्छित असतील तर त्यांनी सरकारकडे यावे. सरकार यासाठी तयार आहे. एमएसपी सुरुच राहणार आहे. यंदा २३ टक्के जास्त शेतकर्‍यांकडून धान्य खरेदी करण्यात आली. मला पूर्ण विश्‍वास आहे की, शेतकरी देशहिताच्या या कायद्याला समजून घेतील. त्यांना या कायद्यातून सर्व प्रकारच्या बंधनांतून मुक्ती मिळणार आहे.

Protected Content