शरद पवारांनी कोषारीचा स्वाभिमान काढला

उस्मानाबाद: वृत्तसंस्था । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वादग्रस्त पत्र लिहिल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कानउघडणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोश्यारींना ‘स्वाभिमान असेल तर पदावर राहायचं की नाही याचा विचार करावा,’ असा दणका आज दिला .

मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तुम्ही अचानक सेक्युलर कसे झालात, अशी विचारणाही केली होती. त्यावरून . सत्ताधारी नेत्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही राज्यपालांच्या भाषेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कोश्यारी यांनी ही भाषा टाळायला हवी होती, असं म्हटलं होतं.

तुळजापूर येथील पत्रकार परिषदेत पवारांना विचारण्यात आलं असता त्यांनी कोश्यारी यांच्या भूमिकेचा समाचार घेतला. ‘१९५७ पासून मी महाराष्ट्राचे राज्यपाल पाहिलेत. इतकंच नाही तर १९६७ नंतरच्या प्रत्येक राज्यपालांशी माझा संबंधही आला. मात्र, अशी भूमिका कुणी कधी घेतली नव्हती. राज्यपाल पद हे देशातील अत्यंत महत्त्वाचं पद आहे. त्याची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचीही प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. तसं झालं नाही तर अस्वस्थता पसरणे स्वाभाविक आहे,’ असं पवार म्हणाले. ‘देशाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात राज्यपालांची कानउघडणी केली ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे. गृहमंत्र्यांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर स्वाभिमान असेल तर कोश्यारी यांनी या पदावर राहायचं की नाही हा विचार करावा, असंही पवार म्हणाले. ‘गृहमंत्र्यांनी जाहीरपणे टीकाटिप्पणी केल्यानंतरही ते तिथं बसणार असतील तर ठीक आहे. ‘शहाण्याला शब्दांचा मार’ अशी एक म्हण आपल्याकडं आहे. मात्र, यातील तो शब्द इथे लागू होतो का हे माहीत नाही,’ असा टोला पवारांनी हाणला.

Protected Content