नवी दिल्ली: वृत्तसंस्था । काही वृत्तवाहिन्यांमध्ये बॉलीवूडविरोधात बदनामीची मोहीम चालवण्यात आल्याची तक्रार करत चार बॉलीवूड असोसिएशन आणि ३४ बॉलीवूड निर्मात्यांनी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
बेजबाबदार आणि अपमानजनक टिप्पणी करण्यापासून संबंधित वृत्तवाहिन्यांना रोखण्यात यावे संबंधित वृत्तवाहिन्यांमध्ये बॉलीवूडमधील कलाकारांविरोधात मीडिया ट्रायल सुरू असून अशा ट्रायलना पायबंद घालण्यात यावा, अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाप्रकरणी बॉलीवूडच्या निर्मात्यांनी दिल्ली हायकोर्टात काही वृत्तवाहिन्याच्या बेजबाबदार रिपोर्टिंगविरोधात खटला दाखल केला आहे. करण जोहर , यशराज , आमिर खान , शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या प्रोडक्शन कंपन्या, चार फिल्म इंडस्ट्री असोसिएशन आणि ३४ निर्मात्यांनी ही याचिका दाखल केली आहे.
हा खटला रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि प्रदीप भंडारी, टाइम्स नाऊ आणि राहुल शिवशंकर, तसेच नविका कुमार यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.
वृत्त वाहिन्या आणि याबरोबरच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने बॉलीवूड आणि बॉलीवूडच्या सदस्यांविरोधा बेजबाबदार आणि अपमानजनक टिप्पणी करण्यापासून अलिप्त राहिले पाहिजे असे याचिकेत म्हटले आहे. अशा वृत्त वाहिन्यांना चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींविरोधाक मीडिया ट्रायल चालवणे आणि चित्रपट उद्योगातील लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकारात हस्तेक्षेप करण्यापासून रोखले पाहिजे, असेही याचिकेत म्हटले आहे.