


जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात या वर्षापासून उद्यापासून क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या क्रीडासंकुलात क्रीडा महोत्सव होणार असून यात जळगाव, धुळे, नंदुरबार व एरंडोल या चार विभागात सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात झालेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवातील विजेते व उपविजेते संघ या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यात खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल या सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा (पुरुष व महिला) प्रकाराचा समावेश आहे. ७५० विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. वैयक्तिक क्रीडा प्रकारात १००, २००, ४००, ८००, १५००, ५००० मीटर धावणे तसेच गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी तसेच ४ु१००, ४ु४०० मीटर रिले या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
शनिवारी सकाळी महोत्सवाचे उदघाटन माजी कुलगुरू प्रा.आर.एस. माळी यांच्या हस्ते होणार असून कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. ३ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील व कार्याध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी दिली.


