रेमडेसीव्हिरची निर्यात थांबवा, पुढील महिन्यात एक लाख डोसची गरज — राजेश टोपे

 

 

मुंबई: : वृत्तसंस्था । पुढील महिन्यात एक लाख रेमडेसीव्हिरची गरज भासणार आहे. हा आकडा वाढू शकतो. रेमडेसीव्हिरची निर्यात तात्काळ थांबवा, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली  राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी या बैठकीचं आयोजन केलं  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना परिस्थिती आकडेवारीसह मांडली. सध्या राज्याला 50 हजार रेमडेसीव्हिर इंजेक्शनाची गरज आहे. पुढील महिन्यात हा आकडा एक लाखाहून अधिक जाणार आहे. राज्यात रेमडेसीव्हिरची कमतरता आहे. त्यामुळे रेमडेसीव्हिरची निर्यात तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी टोपे यांनी केली.

 

राज्यात रेमडेसीव्हिरचा काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. प्रत्येक खासगी रुग्णालयांना रेमडेसीव्हिरची माहिती विचारली जाणार आहे. कुणाला लस दिली जातेय याचीही तापसणी करण्यात येणार आहे. रेमडेसीव्हिर देण्यात येणाऱ्या रुग्णांची वर्गवारी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रेमडेसीव्हिरचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून जिलाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयावर नियंत्रण ठेवावं, अशा सूचनाही त्यांनी  दिल्या.

. राज्यातील कोरोना लसीकरण वेगाने होत असल्याने महिन्याला एक कोटी लस लागणार आहेत, असं सांगतानाच  या विषयात कुणालाही राजकारण करायचं नाहीये. 25 वर्षापासून आपण एकमेकांना ओळखतो. मी काय फार मोठा माणूस नाही. संक्रमण वेगाने पसरतंय. विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा मदत करावी. व्हॅक्सिन मिळावं, आयसीयू, आणि व्हेंटिलेटर मुंबई आणि पुणे येथे वाढवण्याची गरज आहे. ऑक्सिजनची कमतरता केंद्र सरकारला सांगून दूर करावी, असं टोपे म्हणाले.

 

बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एक महिन्याचा लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले होते. राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे. निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं रुग्ण संख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. .

Protected Content