रेणू शर्माची तक्रार राजकीय दबावातूनच ; गृहमंत्री देशमुख यांचा गौप्यस्फोट

 

नागपूर : वृत्तसंस्था । सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजकीय दबावातून तक्रार करायला लावली होती, अशा पद्धतीचं वक्तव्य पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी केल्याचा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

राजकारणाची पोळी भाजण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले होते, त्याबाबतही रेणू शर्मा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करुन तक्रार मागे घेतली होती. यावेळी तक्रार मागे घेताना त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्याचाच आधार घेत अनिल देशमुख यांनी वरील वक्तव्य केलं.

“रेणू शर्मा यांनी त्यांची तक्रार मागे घेतली हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. राजकीय दबावापोटी तक्रार करायला लावली होती, अशा पद्धतीचं वक्तव्य रेणू शर्मा यांनी केलेलं आहे. हा विषय आता संपला आहे. मात्र, राजकारणाची पोळी भाजण्यासाठी धनंजय मुंडेंवर ज्या पद्धतीने आरोप केले ते चुकीचे होते, या सगळ्याबद्दल रेणू शर्मा यांनी सांगितलं आहे,” असं देशमुख म्हणाले.

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर स्पष्टीकरण दिलं होतं. “मी धनंजय मुंडे यांच्याविरोधात लग्नाचं आश्वासन देऊन बलात्काराचा जो आरोप केला होता त्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करत आहे. धनंजय मुंडे आणि माझ्या बहिणीच्या नात्यात काही दिवसांपासून तणाव होता. त्यांचं हे प्रकरण न्यायालयात गेल्याने मी मानसिक तणाव आणि दबावात आले होते. मात्र, आता विरोधी पक्ष देखील त्यांच्याविरोधात जात असल्याच पाहून राजकारणातील मोठ्या षडयंत्राचा बळी ठरत आहे असं मला वाटतंय. माझी लग्नाचं आश्वासन न पाळण्याची किंवा बलात्काराची कोणतीही तक्रार नाही. तसेच माझा कोणताही अयोग्य फोटो किंवा व्हिडीओ देखील नाही. मी हे सर्व अगदी विचारपूर्वक सांगत आहे” असं रेणु शर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.

Protected Content