राम मंदिर भूमिपूजनाच्या मंगल प्रसंगी बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) राममंदिराचे अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे. अर्थातच या क्षणी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आज होऊ घातलेल्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे यांनी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

राज ठाकरे यांनी पत्र पुढे म्हटले आहे की, अयोध्येतील राम मदिरासाठीची न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत. यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, न दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. आपल्या रामाचा वनवास संपला.

 

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराची कोनशिला रचली जाईल. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. राममंदिर हा आजवर भाजपच्या प्रमुख अजेंड्यापैकी एक होता. त्यामुळे बुधवारी होऊ घातलेल्या भूमिपूजन सोहळ्याचा क्षण भाजपकडून उत्सवाप्रमाणे साजरा केला जाईल.

Protected Content