राज ठाकरे यांना शरद पवारांकडून उत्तर

 

मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्याला आता स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

 

राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असं शरद पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणावरुन फसवणूक केल्याचा दावा केला. घटना दुरुस्तीने आरक्षण मिळेल हा गैरसमज असून, केंद्राकडून ओबीसींची शुद्ध फसवणूक होत आहे, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.

 

यावेळी शरद पवारांना राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी पवारांनी जोरदार टोला लगावला. राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार यांचे लिखाण वाचावे, असं शरद पवार म्हणाले.

 

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

 

Protected Content