“युवा संवाद भारत @2047” करीता 20 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  देशाचे प्रधानमंत्री यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली देशभर भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील महनीय व्यक्तींचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री यांनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंचप्राण मंत्र ची घोषणा केली आहे. त्यानुसार अमृत महोत्सव काळातील भारत @2047 ची झलक यासंदर्भात युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय व त्यांची स्वायत्त संस्था नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) हे 1 एप्रिल ते 31 मे, 2023 या कालावधीत देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये समुदाय आधारित संस्था (CBO) मार्फत युवा संवाद भारत @2047 या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे.

 

 

जिल्ह्यातील विविध समुदाय आधारित संस्थांच्या (CBOs) मदतीने आणि सहाय्याने जिल्हास्तरावर कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे. ज्या संस्था अथवा व्यक्ती पंच प्राण अनुरूप सकारात्मक संवाद निर्माण करण्यासाठी, नेहरु युवा केंद्र, जळगाव यांच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक असतील. त्यांनी नेहरू युवा केंद्र, गट क्रमांक 40, प्लॉट क्रमांक 60, द्रौपदी नगर, जळगाव, पिन 425001 येथून अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. विहित नमुन्यातील अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2023 आहे.

 

हा कार्यक्रम टाऊन हॉल स्वरूपात आयोजित केला जाणार असून ज्यामध्ये तज्ञ/जाणकार व्यक्ती असणार आहेत. जे पंच प्राण वर चर्चा करतील आणि त्यानंतर किमान ५०० तरुणांच्या सहभागासह प्रश्नोत्तरांचे एक सत्र होईल. आयोजक CBO ला कार्यक्रम आयोजित करण्यासाठी 20 हजार रुपये इतकी प्रतिपूर्ती केली जाईल. ज्या CBOs अर्ज करू इच्छितात त्या संस्था राजकीय, पक्षपाती नसाव्यात. युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुरेसे संघटनात्मक बळ त्यांचेकडे असावे. संस्थाविरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त 3 सीबीओ संस्थांची निवड करण्यात येईल. अर्ज https://drive.google.com/file/d/1T9Wb3IGF0Vfa2AO795kwTYLakIcP2MX4/view?usp=sharing या लिंकवरुन डाऊनलोड करावा. अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र, जळगाव येथे किंवा [email protected] या ईमेलवर किंवा 0257/2951754 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन नरेंद्र डागर, जिल्हा समन्वयक, नेहरु युवा केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

Protected Content