यावल प्रतिनिधी । गुजरात मधून आलेल्या वीटभट्टीच्या १३० जणांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे, मात्र या नागरिकांची आरोग्यासह जेवणाचे मोठे हाल होत असून आरोग्यविभागाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक पुंडलिक बारी यांनी केली आहे.
यावल तालुक्यातून व शहरातून कामानिमित्त किंवा नोकरी संदर्भात परप्रांतात आपल्या कुटुंबासह राहत असलेले नागरिक व हातावर पोट भरून उदरनिर्वाह करणारे नागरिक आपापल्या गावी परतू लागल्याने मोठ्या संख्येत तालुक्यात देखील परत येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. ४ दिवसापूर्वी यावल येथील राहणारे वीटभट्टी मजूर वाटेल त्या मार्गाने सुरत गुजरात येथून गावात परत आले. आपल्या गावी परत आल्यावर त्यांना येथील पोलिस प्रशासन व महसूल विभागाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबांची व नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले.
दरम्यान ही सर्व वीटभट्टी आणि मजुरी करणारी नागरिक असून महिला पुरुष, लहान मुले असे एकूण १३० लोकांना शहराबाहेर असलेल्या डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. याठिकाणी विलगीकरण करण्यात आलेली या गोरगरीब मजुरांची नगरपालिका व येथील प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या ३-४ दिवसापासून या ठिकाणी विलगीकरण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आलेले नागरिकांना आरोग्यसेवा तर सोडाच त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील होत नसल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक पुंडलिक बारी यांनी तहसीलदार जितेंद्र कुवर यांची तात्काळ भेट घेऊन या सर्व समस्या व परिस्थितीची जाणीव करून दिली. त्याची दखल घेत प्रशासनाने या सर्व नागरिकांची तात्काळ आरोग्य तपासणी करून तसेच त्यांना जेवण आधी सोयी उपलब्ध करावीत, अशी मागणी केली.