पुणे (वृत्तसंस्था) दिल्ली हे देशातील एक वेगळं शहर आहे. तिथे अनेक राज्यांतील लोक राहतात. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल हा दिल्लीपुरता मर्यादित नाही. तर देशभरात बदलाचे वातावरण आहे. भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झाली आहे आणि ती आता थांबणार नाही. तसेच मोदी आणि अमित शाह यांच्या अहंकाराला लोक कंटाळले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवार पुढे म्हटले की, धार्मिक भावना चेतवून दोन समाजांमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. यामुळे दिल्लीत धार्मिक कटुता कशी निर्माण होईल याचीही काळजी घेतली पाहिजे. गोळी मारा सारख्या घोषणा झाल्या. त्या सगळ्याला जनतेने योग्य ते उत्तर दिले आहे. दिल्लीत लागलेल्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. झारखंडमध्येही असाच कौल मिळाला, मध्यप्रदेश, छत्तीसगढलाही हेच झाले. भाजपाच्या पराभवाची सुरु झालेली मालिका कुठे थांबेल असे वाटत नाही. लोकांना स्थिर आणि विकासाला चालना देणारे सरकार हवे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे असेही शरद पवार म्हणाले. तसेच पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचेही अभिनंदनही केले आहे.