मुसळी येथील भव्य प्रवेशद्वार देणार शिवविचारांची स्फुर्ती !-पालकमंत्री

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मुसळी येथील ग्रामपंचायतीने लोकसहभागातून उभारलेले भव्य शिव प्रवेशद्वार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी परिसरातील जनतेला स्फुर्ती देत राहील असे प्रेरणादायी प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. मुसळी येथील प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

याबाबत तालुक्यातील मुसळी येथील ग्रामपंचायतीने लोकसहभागातून उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मुसळी येथील हे प्रवेशद्वार आकाराने अतिशय भव्य असून यामुळे आपल्याला शिवकालीन युगात आल्याचा भास होतो. एखाद्या किल्ल्यावरील बुरूजासमान उभारलेले हे प्रवेशद्वारे हे आकाराने जितके मोठे आहे तितकेच त्या पेक्षाही जास्त विचारांना शिवसंस्काराची चालना देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खर्‍या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्याच लोकल्याणकारी विचारांचा वारसा शिवसेनेच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी वापरला जात आहे. हे प्रवेश द्वारे मुसळीच नव्हे तर येथून ये-जा करणार्‍या प्रत्येकासाठी स्फुर्तीस्थान ठरणार आहे. विशेष करून यातून तरूणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासाचे प्रत्येक क्षणाला स्मरण होणार असून याच प्रमाणे वर्तमानातही काही तरी भव्य-दिव्य करण्याची प्रेरणा नक्की मिळेल असे ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ होते.

या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जि.पं. सदस्य गोपाल चौधरी, पं.स. सभापती मुकुन्द नन्नवरे, सरपंच सौ. इंदुताई पाटील, एकलग्न सरपंच संजय पाटील, पी. आर. गायकवाड, अनिल पाटील, मोहन पाटील राजू भैया पाटील, विभाग प्रमुख टिकाराम पाटील, उपसरपंच लहू ठाकरे, भागवत चौधरी, गोकुळ नाना पाटील, ग्रा.वि.अधिकारी पाठक, मधुकर मराठे, माजी.सरपंच रमेश गुंजाळ, वसंत पाटील, प्रशासक संजय कुमार शर्मा, यांच्या सह मुसळी व चिंचपुरा परिसरातील सरपंच व ग्रा.प. सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सामाजिक कार्यकर्ते पी.के.पाटील यांनी केले तर आभार गोकुळ नाना पाटील यांनी मानले.

यावेळी मुसळी येथे ग्राम पंचायतीवर १०० % महिला राज होते. त्यांच्या काळातील गावाच्या विकासासाठी विविध विकास कामे व भव्य दिव्य असे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार केल्याबद्दल पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी माजी सरपंच इंदुताई पाटील, निर्मलाताई गुंजाळ, तुळसाबाई पारधी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Protected Content