मुंबईत युवा क्रिकेटपटूची गळफास घेवून आत्महत्या

मुंबई वृत्तसंस्था । आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नैराश्येतून 27 वर्षीय युवा क्रिकेटपटूकरण तिवारीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

कुरार पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, करण तिवारी मालाड पूर्व भागातील जानू कंपाऊंडमध्ये इमारतीत आई आणि भावासोबत राहत होता. स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणारा करण आयपीएलसाठी तयारीही करत होता.

आयपीएलसाठी संघाची निवड झाल्याची माहिती त्याला मिळाली, मात्र आपलं सिलेक्शन न झाल्याने तो काहीसा नाराज असल्याचे म्हटले जाते. त्याने दहा ऑगस्टला रात्री 10.30 वाजता राजस्थानमध्ये राहणाऱ्या आपल्या मित्राला कॉल केला. सिलेक्शन न झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याची माहिती त्याने मित्राला दिली.

घाबरलेल्या मित्राने राजस्थानमध्ये असलेल्या करणच्या बहिणीला फोन केला, तिने आपल्या आईला तातडीने फोन केला. मात्र त्याचे कुटुंबीय त्याच्या खोलीत पोहोचून दरवाजा तोडेपर्यंत करणने गळफास घेतला होता, अशी माहिती आहे. घरातील चादरीने पंख्याला दोर लटकावून करणने आत्महत्या केली.

करणच्या कुटुंबाने कुरार पुलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. करण तिवारी क्रिकेट खेळण्यात माहीर होता.

Protected Content