मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावातील मनगुत्ती गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी मुंबईतील कानडी शाळांना देण्यात येणारे अनुदान राज्य शासनाने आणि महापालिकेने बंद करावे, अशी मागणी करणारे पत्र शिवसेना नगरसेवकांनी विभागप्रमुख आणि महापौर यांच्या नावे लिहावे, असे म्हटले आहे.
बेळगाव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ आज लालबाग येथे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, त्यावेळी महापौर किशोरी पेडणेकर बोलत होत्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ आंदोलन करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे पुन्हा पुंगी वाजवण्याचे दिवस आलेले आहेत. कानडी लोकांच्या इथे नाड्या आवळल्या, तर जे कर्नाटकातील लोक आहेत त्यांना समजेल, असेही पेडणेकर म्हणाल्या. दरम्यान, राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये कर्नाटक सरकारविरुद्ध आज आंदोलन करण्यात आले.