मानसिक छळामुळेच पक्षांतराचा निर्णय

जळगाव: प्रतिनिधी । . माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी करायला लावला. या सर्व मानसिक छळामुळेच मी पक्षांतराचा निर्णय घेतला, अशी खळबळजनक प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी राजीनाम्यानंतर दिली आहे.

भाजपच्या सर्व पदांसह सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते मुक्ताईनगरात पत्रकारांशी बोलत होते. खडसे पुढे म्हणाले की, ‘ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते. त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचे काम केले. भाजपने मला अनेक मोठी पदे दिली. मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील एकाही नेत्यावर टीका केली नाही.’माझा आजही भाजपवर रोष नाही. पण, मला देवेंद्र फडणवीसांनी छळले आहे. पण मी फक्त फडणवीसांवर खूप नाराज आहे माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. खासदार रक्षा खडसे या देखील भाजप सोडणार नाहीत, असेही खडसेंनी सांगितले. त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत,’ असे सूचक विधान खडसे यांनी केले.

‘त्या कालखंडात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना किंवा इतर कोणत्याही पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नसताना माझा राजीनामा घेण्यात आला. माझी भाजपाविषयी तक्रार नाही. केंद्रीय नेतृत्वाविषयी किंवा प्रदेश कार्यकारिणीवर मी नाराज नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्यानेच मी भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचे ते म्हणाले.

भाजपसाठी उभे आयुष्य घालवले. मात्र, माझ्या चौकशा फडणवीसांनी लावल्या व त्यामुळे प्रचंड बदनामी सहन करावी लागली. मला काय मिळाले वा नाही, याच्याशी घेणे देणे नाही. माझ्या कथित पीएवर नऊ महिन्यांपासून पाळत ठेवण्यात आली. ही एकप्रकारे मंत्र्यावर पाळत होती. पुढे जाऊन त्याची कबुली सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी दिली. जे पद मिळवले ते मी स्वतःच्या ताकदीवर मिळवल्याचे त्यांनी सांगितले. आजही मोठे आक्षेप असलेले नेते भाजपत कार्यरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

माझ्या मागे भ्रष्टाचारविरोधी विभागाचा ससेमिरा लावण्यात आला. भूखंड प्रकरणात आरोप करण्यात आले. विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नव्हते. पण देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. मी १५ दिवसांपूर्वी खोट्या खटल्यातून बाहेर पडलो. मात्र, यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला गेले काही महिने प्रचंड मन:स्ताप भोगावा लागला, असेही खडसे म्हणाले.

जनतेची ताकद माझ्यासोबत असल्याचे एकनाथ खडसे यावेळी म्हणाले. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देताना आज खूप वाईट वाटत आहे. भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. लोकं शिव्या द्यायचे, दगडधोंडे मारायचे, थुंकायचे तेव्हा आम्ही पक्षासाठी पायपीट केली. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, फरांदे, फुंडकर, मुनंगटीवार यांच्यासोबत प्रामाणिक काम केले. पण नंतरच्या काळात खूप त्रास सहन करावा लागला. पक्षाने अनेक मोठी पदे दिली. माझा भाजपवर रोष नाही, केंद्रीय नेत्यावर कधीही नव्हता, असंही ते म्हणाले .

Protected Content