माझ्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवले : नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई प्रतिनिधी | आपले जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्यात आले होते असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी केला असून या संदर्भातील पुरावे आजच्या पत्रकार परिषदेत सादर केलेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणात पुन्हा एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, माझा जावई समीर खानला २०० किलो ड्रग्ज सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असं सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचं उघड झालं आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. यावेळी नवाब मलिक यांनी एसीबीच्या अधिकार्‍याच्या नंबरवरून व्हॉट्सऍपवर पाठवण्यात आलेली प्रेस रिलीज आणि कारवाईचे फोटो देखील दाखवले. तसेच, त्यांनी सबंंधीत अधिकार्‍याचा फोन नंबर देखील दाखवला.

नवाब मलीक पुढे म्हणाले की, कोर्ट ऑर्डरमध्ये म्हटलंय की २०० किलो गांजा मिळालेला नाही. फक्त शाहिस्ता फर्निचरवालाकडे ७.५ ग्राम गांजा मिळाला. बाकी सगळं हर्बल टोबॅको आहे असं रिपोर्टमध्ये आलं आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की एवढ्या मोठ्या एनसीबीसारख्या एजन्सीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्यकारक आहे. या एजन्सींकडे इन्स्टंट टेस्टिंगचं किट असतं. ज्यातून अंमली पदार्थ आहे किंवा नाही हे लगेच समजतं. याचा अर्थ त्यांनी या सर्व गोष्टी तपासल्या, गांजा नव्हता. पण तरी लोकांना अडकवण्यात आलं. २७ अ चं कलम लागूच होत नाही.

मलीक म्हणाले की, २७ तारखेला एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात समीर खान आणि त्याच्यासोबतच्या दोन इतर आरोपींना साडेआठ महिने जेलमध्ये राहिल्यानंतर जामीन दिला गेला. माझ्या जावयाला साडेआठ महिने जेलमध्ये राहावं लागलं. माझी मुलगी मानसिक धक्क्यामध्ये होती. त्यांच्या दोन लहान मुलांवर परिणाम झाला. सर्व चॅनल्सवर मोठ्या प्रमाणावर गांजा मिळाल्याचं दाखवलं जात होतं. पण घराच्या तपासणीत असं काहीही सापडलं नाही. पण माध्यमांना तसं सांगितलं गेलं. लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे. एनसीबी बनाव करते. या प्रकरणात एनसीबीचा हा सगळा बनाव उघड झाला आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

Protected Content