माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस

 

कराड (सातारा) : वृत्तसंस्था । माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडे संपत्तीचे मागील दहा वर्षांतील विवरण मागण्यात आले आहे. २१ दिवसांत या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे.

पृथ्वीराज यांना ऐन दिवाळीतच आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी आज माध्यमांना माहिती दिली. प्रत्यक्ष हजर राहण्यासही सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने आम्ही योग्य ती कार्यवाही करत आहोत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. ही नोटीस म्हणजे आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे नमूद करतानाच चव्हाण यांनी केंद्रातील भाजप सरकारलाही लक्ष्य केले.

 

शरद पवार यांना बजावण्यात आलेल्या नोटीसवर बोट ठेवत चव्हाण यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आपले परखड मत व्यक्त केले. सत्तेचा वापर कसा करायचा?, तो कोणासाठी करायचा?, याबाबत भाजपने नियोजनबद्धपणे व्यूहरचना केली आहे. त्यानुसार सगळं काही सुरू असतं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अशीच नोटीस आली होती आणि आता मला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर योग्य ते स्पष्टीकरण मी देणारच आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

केंद्रातील मोदी सरकार व भाजपला तुम्ही सातत्याने लक्ष्य करत आहात. देशाच्या आर्थिक स्थितीपासून ते कृषी कायद्यांपर्यंत अनेक मुद्द्यांवर तुम्ही सरकारवर आरोप केले आहेत. त्यामुळेच तुम्हाला त्रास देण्यासाठी, तुमचे खच्चीकरण करण्यासाठी ही नोटीस बजावली गेली आहे असे वाटते का, असे विचारले असता तसे काही असेल असे मला वाटत नाही मात्र, सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपला चांगलं माहीत आहे, इतकेच मी म्हणेन, असे विधान चव्हाण यांनी केले.

बिहारमध्ये भाजपने मोठी खेळी खेळली आहे. त्यांना नितीशकुमार यांची राजकीय कारकीर्द संपवायची आहे आणि चिराग पासवान यांच्या नेतृत्वाला खतपाणी घालून त्यांनी ते जवळपास साध्यही केले आहे. चिराग यांनी भाजपचे उमेदवार जिथे होते तिथे उमेदवार दिले नाहीत. नितीश यांच्या जदयुच्या उमेदवारांविरोधात त्यांनी उमेदवार दिले. यातूनच सगळं काही स्पष्ट होतं, असे चव्हाण म्हणाले. बिहार निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

शरद पवार यांना सप्टेंबर महिन्यात आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने ही नोटीस बजावण्यात आली होती. प्रतिज्ञापत्रातील माहितीवर पवारांकडे स्पष्टीकरण मागण्यात आले होते. त्यावरून पवारांनी केंद्र सरकारला जोरदार टोला हाणला होता. केंद्र सरकारचं इतर सदस्यांपेक्षा आमच्यावर जरा जास्तच प्रेम आहे आणि त्याचा आम्हाला आनंदच आहे, अशा शब्दांत पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली होती.

 

Protected Content