माजी मंत्र्याच्या हस्तक्षेपामुळे अर्नबचा जबाब मुबंईत

 

मुंबई: वृत्तसंस्था । वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या गुन्ह्यात ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णव गोस्वामीचा जबाब रायगड ऐवजी मुंबईत नोंदवण्यात आला होता. त्यासाठी फडणवीस सरकारमधील एका मंत्र्यानं हस्तक्षेप केला होता,’ असा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या गुन्ह्यात रायगड पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या मुंबईतील घरातून ताब्यात घेतलं आहे. नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप अर्णव यांच्यावर आहे. नाईक यांनी स्वत: आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तसं नमूद केलं आहे. त्यामुळं अर्णव अडचणीत आले आहेत. राजकीय संरक्षण असल्यामुळंच अर्णव यांच्यावर आतापर्यंत कारवाई होऊ शकली नाही, असं आता पुढं येत आहे.

अन्वय यांनी २०१८ साली आत्महत्या केली होती. राज्यात तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. अर्णव गोस्वामी यांचं नाव या गुन्हयात पुढं आल्यानंतर नियमानुसार, त्यांचा जबाब जिथं घटना घडली व गुन्हा दाखल झाला, तिथं नोंदवणं गरजेचं होतं. मात्र, एका नेत्यानं यात हस्तक्षेप करत तपास अधिकारी अनिल पारसकर यांना मुंबई पोलीस आयुक्तालयातील सह पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात अर्णव यांचा जबाब नोंदवण्यास भाग पाडलं. पारसकर यांना २६ मे २०१८ रोजी तशा सूचना दिल्या गेल्या. त्यानंतर ३० मे रोजी गोस्वामी यांचा जबाब नोंदवण्यात आला,’ असं देशमुख म्हणाले.

Protected Content