महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिहार विकासाचे काम करावे आणि राज्यात शांतता ठेवावी !

मुंबई: वृत्तसंस्था । ‘बिहारच्या विजयाचं श्रेय फडणवीसांना देण्याचा आम्हाला आनंद आहे. हा आनंद भाजपनं साजरा करावा आणि बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी त्यांची मदत घ्यावी. त्यामुळं बिहारला फायदा होईल आणि महाराष्ट्रातही शांतता नांदेल,’ असा टोला शिवसेनेनं भाजपला हाणला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यामुळं भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. बिहार निवडणुकीचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस यांनाही विजयाचं श्रेय दिलं जात आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून बिहारमधील घडामोडींवर भाष्य करताना महाराष्ट्रातील नेत्यांना चिमटे काढले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून हे सरकार पडण्याची भाकितं भाजपचे नेते करत असतात. ‘महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी जो पचका झाला त्याचे दुःख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात. बिहारचे सरकार पाच वर्षे टिकेल असा आत्मविश्वास ते व्यक्त करतात, त्याच वेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून ते फार काळ चालणार नाही अशी खदखद व्यक्त करतात. हे ढोंग आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘बिहारातील भाजप-जदयु सरकारचे बहुमत फक्त दोन-तीन आमदारांचं तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडील बहुमत तिसेक आमदारांचं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची भाषा करणं म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखं आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘देवेंद्र फडणवीस हे निवडणूक काळात बिहारचे प्रभारी होते. फडणवीस यांना बिहार सरकारकडेच जास्त लक्ष द्यावे लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांसारखे नेते अधूनमधून काही पुड्या सोडत असतात आणि महाराष्ट्राचे राज्य शरद पवार चालवत असल्याचे टोमणे मारत असतात. महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच मताचे आहेत. या सगळ्यांनी यापुढे आता बिहारात नितीशकुमारांचे राज्य नक्की कोण चालवेल यावर नजर ठेवली पाहिजे,’ असा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे

Protected Content