महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीच्या तरुण अभियंत्याला उडविले

जळगाव प्रतिनिधी । महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे या कामावरील कंपनीच्या अभियंता सागर प्रकाश बऱ्हाटे वय 22 , रा.हनुमान नगर भुसावळ याचा चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. महामार्ग पायी पार करत असताना एजन्सी जवळ हा अपघात झाला.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आयुष प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला चौपदरी करण्याचा ठेका मिळालेला आहे. त्यानुसार दीड वर्षांपासून महामार्गाचे काम सुरू आहे. या कंपनीत इंजिनिअर म्हणून सागर बऱ्हाटे चार महिन्यांपूर्वी रुजू झाला आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास सागर कामावर आला महामार्गावरील मकरा एजन्सी जवळ आज काम सुरू होते या दरम्यान रस्ता पार करत असताना चुकीच्या बाजूने भुसावळ कडून जळगाव कडे येणाऱ्या विना नंबरच्या बोलोरोने धडक दिली. या धडकेत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली

धडक दिल्यानंतर महिंद्रा कंपनीची बोलरो गाडी घटनास्थळावरून पसार झाली. साईटवर काम करणाऱ्या सहकारी मित्रांनी सागरला तातडीने ऑर्किड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले याठिकाणी सागरचा मृत्यू झाला. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे. सागरच्या पश्चात आई मीनाक्षी, वडील प्रकाश रामा बऱ्हाटे, भाऊ पुष्पक असा परिवार आहे. वडील भुसावळात ओर्कशॉपचे काम करतात, पुष्पक चे आयटीआय पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून तो घरीच आहे.सागर हा भुसावळ शहरातील j.t. महाजन महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिकत असून शिकता शिकता या कंपनीत काम करत असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे. दरम्यान या मार्गाने आतापर्यंत अनेक सामान्य नागरिकांचे बळी घेतले आहे. विशेष म्हणजे आजच्या अपघातात या महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या अभियांत्याचाच बळी गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Protected Content