मराठा आरक्षणावरून फडणवीसांची पुन्हा ठाकरे सरकारवर टीका

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

 

 

मराठा आरक्षणाबाबत काही दिवस अगोदर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना निवदेन सादर केलं. तसेच, आता लवकरच यासाठी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतली जाणार आहे. राज्यपालांना निवेदन सादर केल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या कायदा फुल प्रुफ असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर देखील टिप्पणी केली. त्यावर आता फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

तसेच, “मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजपा सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?” असं देखील फडणवीस यांनी विचारलं आहे.

 

 

तर, “फुल प्रुफ कायद्याचं काय झालं? ते सगळ्यांसमोरच आहे. म्हणूनच आम्हाला राज्यपालांना भेटायला यावं लागलं. तो जर का फुलप्रुफ असता तर आज भेटण्याचा (राज्यपालांना) योग यासाठी आला नसता.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना म्हटलं होतं.

 

मराठा आरक्षण : राज्य सरकारकडून राज्यपालांना निवेदन सादर; लवकरच पंतप्रधानांचीही भेट घेणार!

 

राज्यपलांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश होता.

Protected Content