भुसावळ नागराध्यक्षांना तत्काळ पदमुक्त करा ; काँग्रेस कमिटीची मागणी

भुसावळ, प्रतिनिधी । शहरात नगर पालिकेने कोरोना संदर्भात कोणत्याही स्वरूपाची जनजागृती न करता नगराध्यक्ष यांना कर्तव्यात कसूर केल्याने त्यानं राज्य शासनाने तत्काळ पदमुक्त करावे अशी मागणी भुसावळ शहर काँग्रेस कमिटीकडून प्रांत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना व्हायरसचे जगात धुमाकूळ घातलेला असून देशात व राज्यात याचे रुग्ण आढळलेले असतांना भुसावळ नगर पालिकेने कुठल्याच प्रकारची जनजागृती न करता नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम नगरपालिका व नगराध्यक्ष करीत असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आला आहे. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने शहरात घरोघरी जाऊन मास्क व सॅनिटेशन विनामूल्य केले पाहिजे. आंदोलन करून देखील रस्ते दुरुस्त न केल्याने तसेच गटारी यांची वेळोवेळी साफसफाई न केल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगर पालिका हेतुपुरस्पर शहरातील कामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने शहरातील रस्त्यांची तत्काळ रस्ते दुरुस्ती होणे गरजेचे आहे. नगराध्यक्ष यांनी जनतेच्या हिताचे कोणतेही काम केलेले नसून केवळ ठेकेदारांचे बिले काढण्याचे काम करत आल्याचा गंभीर आरोप केला आहे. झोपडपट्टी भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून तेथील नागरिकांना जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. नागराध्यक्षांनी कर्तव्यात कसूर केल्याने शासनाने त्यांना तत्काळ निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर भुसावळ शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रवींद्र निकम,. भगवान मेढे, विलास खरात, संतोष साळवे, शैलेश आहिरे, सुकदेव सोनवणे आदींच्या स्वाक्षरी आहे.

Protected Content