भाजप आ. नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला

सिंधुदुर्ग वृत्तसंस्था । भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपुर्व जामीन सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नितेश राणे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत.

संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी २७ जानेवारी रोजी फेटाळला होता. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसेच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवसांची मुदत दिली होती.

नितेश राणे यांच्या जामिनाबाबत झालेल्या कालच्या सुनावणीत सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, नितेश राणे यांनी पहिल्यांदा जिल्हा सत्र न्यायालयाला शरण यावे आणि मग नियमित जामिनासाठी अर्ज करावा, ही अट त्यांच्याकडून पाळली गेली का? तसंच हा हल्ला सुपारी देऊन करण्यात आलेलाच आहे. कारण आरोपींमधील कोणीही संतोष परब यांना ओळखत नाही. त्यामुळे ते हल्ला का करतील? त्यामुळे या प्रकरणाच्या योग्य तपासासाठी काही दिवसांची पोलीस कस्टडी आवश्यक आहे.’ असे म्हटले आहे.

Protected Content