भाजपचं उद्धव ठाकरेंना आव्हान

 

 

नाशिक: वृत्तसंस्था । भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हानच दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी कृषी विधेयकांचं विश्लेषण करून दाखवावं, असं आव्हान भाजपचे तुषार भोसले यांनी दिलं आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात सध्या वातावरण तापले आहे. सरकारच्या या निर्णयाचा निषेध म्हणून आज ‘भारत बंद’ पुकारण्यात आला असून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं भाजप संतापला आहे

‘महाविकास आघाडीनं भारत बंदला पाठिंबा दिलाय. या आघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझं आव्हान आहे की कृषी विधेयके ही शेतकरी हिताची कशी नाहीत? याचं विश्लेषण त्यांनी महाराष्ट्राला करून दाखवावं. कोणाकडूनही लिहून घ्या, पाठांतर करून या, कोथळा, मावळा असे सगळे शब्द त्यात घाला, पण तुम्ही विश्लेषण कराच,’ असं भोसले यांनी म्हटलं आहे.

महाआघाडीतील तिन्ही पक्षांनी नव्या कायद्यातील तरतुदींना वेळोवेळी पाठिंबा दिल्याचा दावा भाजपनं केला आहे. केवळ राजकारणासाठी हे पक्ष आता विरोध करत आहेत. वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच केला होता. आपल्या म्हणणं मांडताना त्यांनी शरद पवार यांच्या आत्मचरित्राचा दाखलाही दिला होता. शेतकऱ्यांना लवकरच वस्तुस्थिती समजेल, असंही फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता भोसले यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केलं आहे.

 

Protected Content