प्रदेश भाजपमध्ये निष्ठावंत दाबले जात असल्याचा सूर

मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली. दुसरीकडे प्रदेश भाजपमधील महत्त्वाच्या पदांवर अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांच्या नेमणुका होत असून निष्ठावंत दाबले जात असल्याचा सूर उमटत आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजपची वाढवणाऱ्या खडसे यांना पक्षाच्या नव्या नेतृत्वाकडून डावलले गेले. त्यांच्यावर सातत्याने अन्याय झाल्यामुळे त्यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली, अशी भावना प्रदेश भाजपमधील निष्ठावंत व्यक्त करत आहेत. खडसे यांनी पक्षासाठी उपसलेले कष्ट ज्यांनी बघितले आहेत ते त्यांच्यावर टीका करण्याचे धाडस करणार नाहीत, असेही भाजपमध्ये बोलले जात आहे.

खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केल्यानंतरही भाजपमधून खडसे यांच्यावर कोणत्याही नेत्याने टीका केलेली नाही. उलट प्रदेश भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांना खडसे यांच्यावर अन्याय व्हायला नको होता, असे वाटत आहे. परंतु भाजपमध्ये सन २०१४ पासून मोदी-शहा यांच्या वर्चस्वामुळे पक्षात उघडपणे बोलण्याचे धाडस कोणी करत नाही. भाजपमध्ये अन्यायाविरोधात बोलण्याचे धाडस सध्या कोणी दाखवणार नाही, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.

सन २०१४ पासून केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून निष्ठावंत बाजूला फेकले गेले . पक्षातील महत्त्वाची पदे तसेच विधिमंडळातील पदेही अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांना दिली जात आहेत. त्यामुळे प्रदेश भाजपमध्ये अस्वस्थता आहे. पुढील काही महिन्यांत राज्यात भाजपची सत्ता आली नाही तर अन्य पक्षांतून आलेले नेतेही बाहेर पडतील. तेव्हा निष्ठावंत नेतेच उपयोगी पडतील, असे भाजप नेत्यांचे मत आहे.

भाजपमधील सामाजिक समीकरणांचा ढाचा पूर्णपणे बिघडला आहे. केवळ अन्य पक्षांतील नेते घेऊन पक्षाचा तात्पुरता विस्तार होईल. पक्षातील निष्ठावंत नेत्यांना ताकद दिली असती तर पक्षाचा कायमस्वरूपी विस्तार झाला असता, असे पक्षाचे नेते सांगतात. गेली ३० वर्षे जळगाव जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात होती. तेथील सहकार क्षेत्रावरही भाजपचे वर्चस्व होते, परंतु आता खडसे यांनी पक्ष सोडल्यामुळे जळगावात भाजपला मोठा फटका बसला असल्याचा सूर प्रदेश भाजपच्या नेत्यांमध्ये आहे.

Protected Content