प्रत्येक घरातील प्रत्येकाची महिनाभरात आरोग्य चौकशी

मुंबई  वृत्तसंस्था । राज्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्यांची पुढील महिन्याभरात किमान दोन वेळेस शासकीय पथकाकडून आरोग्य चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं सुरु केलेल्या ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुख्यंमत्र्यांनी आज जनतेशी ऑनलाइन संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे, या बारा कोटी जनतेची आरोग्य तपासणी ही अशक्यप्राय आणि अवघड गोष्ट आहे. यासाठी प्रत्येकाचं घरं शोधणं ही कठीण बाब असली तरी शक्य आहे. सरपंचापासून खासदारापर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या वॉर्डाची जबाबदारी घेतली तर संपूर्ण महाराष्ट्र आपण व्यापू शकतो. याद्वारे प्रत्येक घराची आणि त्यातील सदस्यांच्या आरोग्याची चौकशी आपण करु शकतो. पुढील महिन्याभरात या लोकप्रतिनिधींनी किमान दोन वेळा लोकांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी आपली टीम पाठवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

या योजनेसाठी शासनाच्या आरोग्य विभागाचे, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच इतर आरोग्य कर्मचारी काम करतील. त्यांच्यासोबत यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी होऊ शकतात. हे लोक प्रत्येक घरातील सदस्यांच्या आरोग्याची चौकशी करतील. या चौकशीमध्ये घरोघरी जाऊन घरातील सदस्यांच्या आरोग्याबाबत साधारणतः विचारपूस करतील. घरात पन्नाशीच्या पुढील किती सदस्य आहेत? त्यांची ऑक्सिजन लेवल काय आहे?, त्यांच्यासह इतर व्यक्तींना व्याधी किंवा आजाराची कोणती लक्षणं आहेत का? काही लक्षणं असतील तर ती शासनाच्या यंत्रणेच्या लक्षात आणून द्यायची, त्यानंतर पुढील उपचार काय करायचे? कुठे करायचे? याचं मार्गदर्शन शासकीय टीम त्यांना करेल. मुंबईत ज्या प्रकारे ‘चेस द व्हायरस’ ही योजना राबवली जात आहे त्याचप्रमाणे ही योजना राज्यभरात राबवली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Protected Content