पुलावरून कार कोसळली : अमळनेरातील तीन जण ठार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धुळे जिल्ह्यातील नवलनगर येथे लहान पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात अमळनेरातील तीन जण ठार झाले आहेत. याच अपघातात चौघे जखमी झाले आहेत.

 

काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नाशिकडून अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणारी चारचाकी धुळे तालुक्यतील नवलनगर जवळील छोट्या पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात अमळनेरचे सरलाबाई पंडीत पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०), व शाहू विजय पाटील (वय १०, सर्व रा.अमळनेर) हे ठार झाले आहेत.

 

नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून पाटील परिवार कारने (क्र.एमएच ०४-एफझेड३६८९) अमळनेरकडे येत होता. कारमध्ये जवळपास सात ते आठ जण होते. वेगाने येणारी कार फागणे-अमळनेर रस्त्यावरील नवलनगर गावाजवळ असलेल्या एका लहान पुलावरून खाली कोसळली. या अपघातात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले आहेत.

 

ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना रूग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अनिल महाजन व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content