पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कार जिल्हा परिषद शिरसाड शाळेस प्रदान

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसाड येथील जिल्हा परिषद शाळेस भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार शुक्रवार दि. १७ रोजी नियोजन भवन जळगाव येथे प्रदान करण्यात आला.

 

शिरसाड जिल्हा परिषद शाळेस केंद्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराअंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया , जिल्हा आदिवासी प्रकल्प अधिकारी. विनिता सोनवणे , प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील , माध्यमिक शिक्षणाधिकारी बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता धनंजय पाटील व केंद्राप्रमुख किशोर चौधरी यांनी स्विकारला. हा पुरस्कार मिळाल्याने शिरसाड शाळेचे परिसरात अभिनंदन होत आहे. यासाठी जिल्ह्यातील अनेक शाळांनी online सर्वेक्षण द्वारा स्वयंमूल्यमापन पूर्ण करून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यानंतर पर्यवेक्षीय यंत्रणेद्वारे बाह्य मूल्यमापन पूर्ण होऊन पुरस्कारासाठी शाळांची निवड करण्यात आली आहे. शाळामध्ये स्वच्छता आणि स्वच्छता पद्धतीमध्ये सुधार होण्यासाठी आणि शाळा आणि विद्यार्थी यांना त्याबाबत प्रेरणा मिळावी यासाठी शाळेतील शौचालय सुविधा, हात धुण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, कोविड १९ अनुषंगाने वर्तन अशा ५९ निकषांवर आधारित मूल्यमापन यामध्ये समाविष्ट होते. शिरसाड शाळेने अपेक्षित बाबींची पूर्तता करत ९९% गुण आणि 5 स्टार रेटिंग मिळवत हा पुरस्कार मिळविला आहे. यासाठी यावल तालुक्याचे संपर्क अधिकारी तथा डायट चे वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे साहेब, गटशिक्षणाधिकारी एन के शेख, विस्तार अधिकारी विश्वनाथ धनके, प्रभारी केंद्रप्रमुख किशोर चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगिता धनंजय पाटील यांनी सांगितले.
मुख्याध्यापिका संगिता पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील आमच्या शाळेला हा पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद करत शाळा व्यवस्थापन समिती, शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांना या पुरस्काराचे श्रेय दिले. त्यांनी शाळेमधील इतर उल्लेखनीय बाबींची माहिती दिली. त्यामध्ये शाळेने मागील चार वर्षांमध्ये लोकसहभागातून सहा लाखांपर्यंत किमतीच्या सेवा-सुविधा शाळेमध्ये अद्ययावत केल्या आहेत. शालेय पत्रव्यवहार, बोनाफाईड, शाळा प्रवेश अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज, अर्जित रजेचा अर्ज, शाळा व्यवस्थापन समिती अजेंडा निर्मिती इत्यादी अनेक बाबी online पद्धतीने शाळेच्या स्वतंत्र वेबसाईट वरून किंवा QR कोडच्या माध्यमातून होत असून त्यासाठी एक अनोखी यंत्रणा शाळेत कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक सेवेसाठी एक विशिष्ट QR कोड उपलब्ध असून त्याद्वारे शालेय प्रशासन सोयीस्कर झाले आहे. त्याचबरोबर मासिक टपाल तयार करण्यासाठी सुद्धा शाळेचे स्वनिर्मित App शाळेत कार्यान्वित आहे. त्यामुळे शालेय कामकाजात शिक्षकांचा जाणारा वेळ यामुळे वाचत असून त्याचा उपयोग विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच होणार आहे. प्रत्येक वर्गामध्ये डिजीटल साधने उपलब्ध असल्याने १००% डिजीटल झालेल्या या शाळेमध्ये शिक्षण प्रक्रिया रंजक होण्यास मदत झाली आहे. शाळेमध्ये यापूर्वी बोलक्या भिंती आणि इतर रंगरंगोटी मुळे बालस्नेही वातावरण निर्मिती झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शाळेच्या भौतिक सुविधांची होणारी नासधूस थांबविण्यासाठी शाळेमध्ये CCTV यंत्रणा बसवण्यात आली आहे. शाळेचा पूर्ण परिसर त्यामुळे निगराणी खाली आला आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य अधोरेखित करत संगीता धनंजय पाटील यांनी समितीचे आभार मानले.

Protected Content