अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात नव्हती एवढी जम्बो पोलीस भरतीची प्रकिया सुरू असून उमेदवारांची संख्या पाहता सरकारने फेरमुदत देवून 15 डिसेंबर अंतिम तारीख ठरवली होती. पण तरीही काही उमेदवारांचे सर्व्हर डाऊनमुळे चलन भरता न आल्याने फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे असंख्य उमेदवारांचा भावी पोलिस होण्याचे स्वप्ने पाण्यात बुडली होती. मात्र अशा उमेदवारांची समस्या शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी पातोंडा येथील सेतूचालक पंकज पाटील या तरुणाने थेट मंत्री मंडळातील जेष्ठ मंत्र्यांना फोन करून पोलीस भरतीची पुन्हा मुदत मिळवून द्यावी, अशा आशयाच्या मागणीची गळ घातली.
राज्यातील असंख्य उमेदवारांचे चलन भरले न गेल्याने फॉर्म भरले जाणार नव्हते यामुळे त्यांनी वर्षानुवर्षे पोलीस भरतीसाठी घेतलेली मैदानी मेहनत व अभ्यास वाया जाणार होती म्हणून आपण अशा उमेदवारांचा भविष्याचा सारासार विचार करून पोलीस भरतीची मुदत वाढवून तरुणांना न्याय देण्यात यावा असे पटवून दिले. त्याच्या ह्या तक्रारीची शासन दरबाराने दखल घेत पोलीस भरतीची तारीख वाढवत 21 डिसेंबर ही अंतिम तारीख शासनाने जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते,मुख्यमंत्री यांचे ओडीएस,राज्यातील मंत्री, जळगावचे पालकमंत्री व अन्य नेते तसेच विविध वृत्त वाहिन्यांना पंकज पाटील याने प्रत्यक्ष कॉल करून वास्तवता दर्शवली व शर्तीचे प्रयत्न केलेत. आणि त्याच्या ह्या शर्तीला यश आले असून त्याच्या ह्या कामाचे सर्व परिसरातून कौतुक होत आहे.