पातोंडा येथील कुटुंबावर उपासमारीची वेळ : मदतीचे आवाहन

 

चाळीसगाव, प्रतिनिधी ।  कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी लागू करण्यात आलेल्या कडकडीत टाळेबंदीत हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाचे विचार करण्यात न आल्याने कोरोनापेक्षा भुकेने मरण्याची परिस्थिती अशा अनेक कुटुंबावर ओढावली आहे. यात तालुक्यातील पातोंडा येथील हातमजुरी करणाऱ्या कुटुंबाला काम न मिळाल्याने भिक मागून उदरनिर्वाह करीत असतांना मागील तीन दिवसापासून भिक न मिळाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

 

पातोंडा येथे  गोकुळ प्रभात भिल हा  पत्नीसह तीन मुलांसह राहत आहे.  जन्मताच तीन्ही मुले हे अपंग आहेत. भूमिहीन असल्याने हे दाम्पत्य हातमजुरी करून आपले उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान कडकडीत टाळेबंदी पुकारण्यात आली आणि या परिवाराचे जगणेच असह्य होऊन गेले. हातातील काम गेल्याने घर कसा चालवावा हा पेच कुटुंबांसमोर निर्माण झाला आणि शेवटचा पर्याय म्हणून भिक मांगायला सुरूवात केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ह्या कुटुंबाचे खूप हाल झाले. आता दुसऱ्या लाटेत त्याची पुनरावृत्ती होत आहे. पदरात तीन मुले मुलगी मोनाली  (वय-२४), मुलगा विरू  (वय-१७) व ११ वर्षाचा तिसरा मुलगा हे तीनही मुले अपंग आहे. कोरोनाच्या या भयंकर काळात काहींनी सामाजिक भावनेतून सदर कुटुंबाला मदत केली. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कोणीही भीक न घातल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या  कुटुंबाविषयी कळताच स्वयंदिप फाउंडेशनच्या संस्थापिका मिनाक्षी निकम यांनी पातोंडा येथे धाव घेऊन मानसिक आधार दिला. यावेळी मिनाक्षी निकम यांनी सामाजिक कार्यकर्ता, संस्था व शासनास आवाहन केले असून जास्तीत जास्त जणांनी सामाजिक भान जोपासत हि मदत करावी अशी आग्रहाची विनंती केली आहे.

Protected Content