पाच दिवसीय ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत तयार प्रशिक्षणाचा समारोप

जळगाव, प्रतिनिधी ।  देशातील तरूण मनुष्यबळाचा वापर कशा पध्दतीने करता येतो याचा परिपाठ विद्यापीठाने कोविडच्या या काळात ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत तयार करून घालून दिला असल्याचे प्रतिपादन शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.  

 

ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने आयोजित पाच दिवसीय ‘ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत’ प्रशिक्षण शिबीराच्या  समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी. व्ही. पवार होते.  ज्येष्ठ नागरिक दूत म्हणून आपण आज प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत आहात. समाज ही तूमची प्रयोगशाळा असून आपले स्कील त्या ठिकाणी वापरावयाचे आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील म्हणाल्या की,  घरातील जेष्ठ नागरिक हे कुंटुबाचे आधारस्तंभ असतात. त्यांची गरज काय असते त्यांना वेळेवर जेवण, चहा-पाणी, औषधोउपचार या पलिकडे त्यांच्या काही अपेक्षा नसतात. हीच सेवा त्यांना दिली तर मला वाटते मंदिरात जाण्याची गरज नाही. त्यांच्या सेवतच खरा आंनद आहे.  दिलीप पाटील यांनी सांगीतले की, शिक्षण हे आपली उपजिवीका भाविण्यासाठी नाही. त्याचा उपयोग समाजकार्यासाठीही केला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक हा खुप मोठा ठेवा आहे. तो सांभाळला पाहिजे. आज आपण ज्येष्ठ नागरिक सहाय्यक दूत म्हणून समाजात जाणार आहात. हे काम आपण जिवओतून करा त्यात समर्पण भाव ठेवा. अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्र- कुलगुरु प्रा. बी. व्ही. पवार यांनी जेष्ठ नागरिक सहाय्यक दूत प्रशिक्षणार्थींना सांगीतले की, आपणास समाजात जाऊन कार्य करावयाचे आहे. आपल्या प्रशिक्षणाचा समाजाला फायदा झाला पाहिजे. भविष्यात असे समाज उपयोगी कार्यक्रमांचे विद्यापीठाकडून आयोजन करण्यात येतील.  यावेळी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी पाठविलेला व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला. त्यात त्यांनी सांगीतले की, आज एकत्र कुंटुब पध्दती लोप पावत चालली असून वृध्दाश्रम ही संकल्पना पुढे येऊ लागली आहे. ही बाब चांगली नाही. मात्र जेष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक असणे काळाची गरज लक्षात घेता विद्यापीठाने यासाठी जेष्ठ नागरिक सहाय्यक दूत हा प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केला. प्रशिक्षणार्थ्यांमधून तेजस्वीता जाधव व हेमंत देवरे यांनी तर जेष्ठ नागरिकांतून अरूण माळी व डी. टी. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी  ‘समाजकार्याचा २ वर्षांचा प्रवास आणि वैयक्तिक समाज कार्य’ हा शोधनिबंध सुर्वणा दिलीप पाटील हीने विद्यापीठास सादर केला. यावेळी शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. या शिबिरासाठी १२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती मात्र कोविड नियमांमुळे ५० निवड विद्यार्थ्यांची निवड या शिबिरासाठी करण्यात आली.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. मनिष जोशी यांनी केले. सुत्रसंचालन व आभार  सुभाष पवार यांनी मानले.

 

Protected Content