पाकिस्तानी ‘एनजीओं’ची कोरोना मदतीआडून दहशतवादी कारवायांना मदत?

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारताला मदत करण्याच्या नावाखाली अमेरिकेतील पाकिस्तानी सेवाभावी संस्थांनी कोट्यावधी रुपये गोळा केले हे पैसे आता भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

 

पाकिस्तानमधील बिगर अनुदानित सेवाभावी संस्थांनी कोरोना कालावधीमध्ये भारताची मदत करण्यासाठी कोट्यावधी रुपये देणगीच्या स्वरुपात गोळा केले आहेत. या संस्थांनी हेल्प इंडिया ब्रीद म्हणजेच भारताला कोरोना काळात श्वास घेण्यासाठी मदत करा असं आवाहन करत निधी गोळा केला. भारतामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर्स आणि लसींबरोबरच इतर आरोग्य सुविधा देण्यासाठी मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.  भारतामधील दुसरी लाट  अधिक घातक असल्याने पाकिस्तानमधील अनेकांनी या सेवाभावी संस्थांच्या हेल्प इंडिया ब्रीद मोहीमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात मदत केली.

 

पाकिस्तानी संस्थासंदर्भातील हा अहवाल डीसइन्फो लॅबने जारी केला आहे. अशा  मदतीच्या नावाखाली पैसे गोळा करण्याचा मोठा घोटाळा या अहवालातून उघडकीस आणण्यात आलाय.  या सेवाभावी संस्थाचे पाकिस्तानी लष्करासोबत फार चांगले संबंध असल्याचाही उल्लेख या अहवालात आहे. पाकिस्तानी लष्कराच्या सांगण्यानुसार या संस्था काम करत असल्याची शंका व्यक्त केली जातेय. आता हेच कोट्यावधी रुपये भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाण्याची शक्यता आहे.

 

डीसइन्फो लॅबच्या या अहवालामध्ये किती पैसे गोळा करण्यासंदर्भातील या संस्थाची योजना होती याबद्दलही खुलासा करण्यात आलाय. पैसे गोळा करणाऱ्या संस्थांमध्ये इमाना म्हणजेच इस्लामिक मेडिकल असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेचाही समावेश होता. २७ एप्रिल २०२१ रोजी या संस्थेने आपल्या सोशल नेटवर्किंग पेजेस आणि खात्यांवरुन #Helpindiabreathe या हॅशटॅगसहीत भारताच्या नावाखाली पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीली १.८ कोटी डॉलर निधी उभारण्याचं लक्ष्य संस्थेने ठेवलं होतं. मात्र या मोहीमेमध्ये नक्की किती पैसे मदत म्हणून लोकांनी दिले याची सविस्तर आकडेवारी संस्थेने दिलेली नाही. तसेच हे पैसे कुठे आणि कसे खर्च केले जात आहेत किंवा केले जाणार आहेत यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही. हा इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा डीसइन्फो लॅबने केलाय. १९६७ मध्ये स्थापना झालेल्या इमनाचे कोठेही कार्यालय किंवा काम केलं जात नसल्याचा दावा  अहवालात करण्यात आलाय. त्यामुळेच कारवाई करुन या संस्थेच्या माध्यमातून होणारं निधी संकलन थांबवणं कठीण काम असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

 

दुसऱ्या लाटेमध्ये भारतात रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने एप्रिल आणि मे महिन्यात अनेक शहरांमध्ये आरोग्य व्यवस्थांचा तुटवडा जाणवला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सच्या तुटवड्याच्या बातम्या जगभरातील प्रसारमाध्यमांनी दिल्या. त्यामुळेच जगभरातील वेगवेगळ्या देशांनी भारताला मदत केली होती. पाकिस्तानमधील अनेक कलाकारांनी या संकट काळात भारताला मदत करण्याचं आवाहन केलं होतं.

 

Protected Content