पहिल्या लाटेचा विक्रम मोडला; महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक

 

 

  मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात पहिली लाट असताना म्हणजेच १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ इतकी उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णसंख्येचा विक्रम गुरूवारी मोडीत निघाला आहे.काल राज्यात २५ हजार ८३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली

 

महाराष्ट्राच्या चिंतेत गुरुवारी मोठी भर पडली. कोरोना संकट गडद झाल्याची जाणीव काल  सायंकाळी आलेल्या आकडेवारीने सरकारला आणि जनतेला करून दिली. कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

राज्यात फेब्रवारीपासून अचानक रुग्णसंख्या वाढायला लागली. सुरूवातीला दिवसाला ४ ते ५ हजाराच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत रुग्णसंख्या दहा हजारांच्या काठावर पोहचली. तर मार्च मध्यापर्यंत महाराष्ट्रात २० ते २४ हजारांच्या सरासरीने दररोज रुग्ण आढळून येत आहे. गुरुवारी झोप उडवणारी आकडेवारी समोर आली.

 

. राज्यात पहिली लाट आली, तेव्हा सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली होती. या पूर्वी सर्वाधिक रुग्ण १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ नोंदविले होते. चोवीस तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हजार १७४ जणांनी या आजारावर मात केली. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये सर्वाधिक ४५२३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्याखालोखाल मुंबईत २८७७, पुण्यात २७९१, औरंगाबादला एक हजार २७४, पिंपरी-चिंचवड १२७२ नागरिकांना लागण झाली आहे.

 

मुंबई, पुणे, नागपूर या महत्त्वाच्या शहरांसह राज्यातील इतरही शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. प्रत्येक शहरात दररोज रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून, प्रशासनाकडून निर्बंध वाढवले जात आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू, अंशतः लॉकडाउन आणि कडक लॉकडाउन आदी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मात्र, संसर्ग थांबत नसल्यानं अधिक कठोर उपाय लागू केले जाण्याची शक्यता आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २१,७५,५६५  बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ९०.७९ % एवढे झाले आहे.

Protected Content