…नाहीतर मराठा तरुण नक्षलवादी बनतील

मुंबई वृत्तसंस्था । मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने न्यायालयात बाजू मांडण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरल्याने, मराठा समाज बळी ठरला आहे. अशा शब्दात संभाजी ब्रिगेड संघटनेचे विकास पासलकर यांनी केंद्र, राज्य सरकारवर सडकून टीका केली. लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास मराठा समाजातील तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, असे त्यांनी सांगितले.

विकास पासलकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी कित्येक वर्षापासून लढा दिला जात आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले. त्याच दरम्यान ५० जणांनी बलिदान दिले. तरी देखील राज्य आणि केंद्र सरकारला जाग आली नाही. आरक्षण मिळेल असे वाटत असताना, न्यायालयात राज्य सरकार मार्फत बाजू मांडण्यात कमी पडले की मुद्दाम बाजू मांडली गेली नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने येत्या तीन-चार दिवसात पुर्नविचार याचिका दाखल करावी आणि चांगली बाजू मांडावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आजवर ज्या पक्षांनी सत्ता भोगली ते देखील मराठा समाजाच्या दृष्टीने निर्णय घेण्यात अपयशी ठरले आहेत. त्या सर्व राजकीय पक्षाचा आम्ही निषेध करतो. देशात कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला तिहेरी तलाक, जम्मू काश्मीर येथील कलम ३७० आणि राम मंदिर प्रश्न मार्गी लागू शकतो. तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न का मार्गी लागू शकत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
निवडणुका आल्या की, प्रत्येक पक्ष म्हणतो तुमचा प्रश्न मार्गी लावू, पण पुढे काही होत नाही. आजवर सर्व पक्षांना समजून घेतले. मात्र आता सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील त्यांनी दिला .

Protected Content