नाथाभाऊंबद्दल चंद्रकांत पाटलांचे ” हातांची घडी ; तोंडावर बोट “

पुणे: वृत्तसंस्था । भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलणं टाळलं. ‘रात गयी, बात गयी…’ एवढीच प्रतिक्रिया पाटील यांनी खडसेंबाबतच्या प्रश्नावर दिली

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात अटल बस सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ खडसे यांच्याबद्दल प्रश्न विचारला. मात्र, त्यांनी काहीही बोलणं टाळलं. खडसे हा विषय आता संपला आहे, असंच त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळ्याच्या भाषणात खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये आपल्यावर झालेला अन्याय व कटकारस्थानाचा पाढा वाचला. माझी ताकद काय आहे हे जळगावात मेळावा घेऊन दाखवून देईन, असा इशाराही खडसे यांनी दिला होता. खडसेंच्या इशाऱ्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसेंना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती. मात्र, मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही, असं शरद पवारांनी काल स्पष्ट केलं. त्यावरून पाटील यांनी खडसेंना टोला हाणला होता. ‘राष्ट्रवादी आता खडसेंना काय देते ते पाहूया. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी दुपारी दोनची वेळ ठरली होती. मात्र, कार्यक्रम उशीर सुरू झाला. खडसे यांना काय द्यायचं हे अजून ठरलेलं नसावं. तुमचं समाधान होईल असं देऊ’ इतकंच आश्वासन त्यांना मिळाल्याचं पाटील म्हणाले. ‘समाधान मानायचं तर ते लिमलेटच्या गोळीवरही मानता येऊ शकतं. पण ते मानता आलं पाहिजे. त्यामुळं खडसेंना लिमलेटची गोळी मिळते की कॅडबरी हे लवकरच कळेल. त्यावर ते समाधानी होणार की पर्याय नाही म्हणून पुढं जाणार हे कळेल, असा चिमटा पाटील यांनी काढला होता.

Protected Content