सिंधुदुर्ग वृत्तसंस्था । नाणार प्रकल्पावरून शिवसेनेतच मतभेद असल्याचं आढळून आले आहे. शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी नाणार प्रकल्प राबविण्याबाबत अनुकुलता दर्शवलेली असतानाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मात्र साळवी यांचे विधान खोडून काढले आहे. नाणार प्रकल्पाचा विषय संपला आहे. हा प्रकल्प सुरू होणार नाहीच, असं विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाणारवरून शिवसेनेतच मतभेद असल्याचं दिसून आल्याने स्थानिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.
90 टक्के स्थानिकांनी मोबदला स्वीकारल्याने जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच धर्तीवर नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी पुढचा निर्णय घेईल, असं राजन साळवी यांनी म्हटलं होतं. त्यामुळे नाणारवरून शिवसेना बॅकफूटवर आल्याची जोरदार चर्चा रंगली होती. विरोधकांनीही शिवसेनेच्या या भूमिकेचं स्वागत केलं होतं. तर, स्थानिकांनी शिवसेनेच्या या बदलत्या भूमिकेवर संताप व्यक्त केला होता. त्यामुळे विनायक राऊत यांना पुढे येऊन सारवासारव करावी लागली आहे. स्थानिक जनतेचा नाणार प्रकल्पाला विरोध असल्यामुळे या प्रकल्पाचा विषय कायमचा संपला आहे. हा प्रकल्प पुनश्च होणार नाही. तशी स्वप्ने कुणीह पाहू नये, अशी सारवासारव राऊत यांनी केली होती.