जळगाव प्रतिनिधी । रविवार सुट्टी असल्याने मित्रासह दुचाकीने कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेल्या दोन मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, तालुका पोलीस पथक घटनास्थळी धाव घेतली असून पाण्यात बुडालेल्या तरूणाचा शोध घेणे सुरू आहे.
अधिक माहिती अशी की, श्रीराम नगर जूना आसोदा रोड येथील राहणारा चेतन अरूण पाथरवट (वय-३१) व त्याचा मित्र (सागर पाटील रा. कांचन नगर) हे दोघे दुचाकीने शहरापासून १० किलोमीटरवर असलेल्या गिरणा नदीवरील कांताई बंधाऱ्यावर रविवार सुट्टीच्या निमित्ताने फिरण्यासाठी दुपारी गेले. दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास दोन्ही कांताई बंधाऱ्याच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. यातील चेतन अरूण पाथरवट याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दुसऱ्याने आरडाओरड केल्याने काही तरूणांच्या मदतीने पाण्याच्या बाहेर काढण्यात आले असून तो बाचावला आहे. घटनेची माहिती मिळाताच तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस कर्मचारी सतीश हळनोर, विलास पाटीलसह इतरांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
पाण्यात बुडालेल्या तरूणाचा शोध धानोरा ता.जि.जळगाव येथील तरूणांच्या मदतीने घेण्यात येत आहे. यावेळी धानोरा गावातील पोलीस पाटील पुनम सोनवणे, देवराम सोनवणे, तलाठी सारीका दुर्मळ यांच्यासह गावातील ग्रामस्थ यांची मोठी गर्दी जमली होती.