नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गेल्या २४ तासांची आकडेवारी पाहाता देशभरात एकूण २ लाख ३४ हजार ६९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. दुसरीकडे १ लाख २३ हजार ३५४ रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे ही दिलासादायक बाब ठरली आहे.
काही महिन्यांपूर्वी कमी होऊ लागलेलं कोरोनाचं प्रमाण देशात पुन्हा एकदा वाढू लागलं आहे. वाढताना हे प्रमाण भीषण होऊ लागलं आहे. पहिल्या लाटेमध्ये देखील जितके रुग्ण आढळले नव्हते आणि जितक्या रुग्णांचा मृत्यू झाला नव्हता, ते आकडे आता दिसू लागले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल १ हजार ३४१ रुग्णांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. ४ दिवसांपासून रोज देशभरात १ हजारहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद होत आहे. त्यामुळे विविध राज्यांसोबतच केंद्रीय प्रशासन देखील चिंतेत आलं असून त्यापाठोपाठ नवीन बाधित आढळण्याचं प्रमाण रोज नवनवे विक्रम करत आहे.
देशातील एकूण बाधितांचा आकडा आता १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ झाला आहे. मात्र, अजूनही देशात १६ लाख ७९ हजार ७४० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आजपर्यंत करोनामुळे तब्बल १ लाख ७५ हजार ६४९ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.
महाराष्ट्राचा विचार करता, शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ बाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.६१ टक्के आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. शुक्रवारी ४५ हजार ३३५ रूग्ण बरे देखील झाले राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.१२ टक्के आहे.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी ७ नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारे जाहीर प्रचारसभा, नुक्कड सभा, पथनाट्य किंवा रॅली करण्यावर बंदी घातली आहे.